तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. अनेक वर्षांपूर्वी पुनर्वसन व विविध प्रकल्पांच्या उद्देशाने सुमारे १०० शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या होत्या. मात्र आजपर्यंत त्या जमिनींचा संबंधित प्रकल्पासाठी वापर करण्यात आलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी गेल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत. शासनाच्या जमीन संपादन व पुनर्वसन नियमांनुसार, संपादित जमीन मूळ उद्देशासाठी वापरली गेली नसेल तर ती जमीन मूळ धारकांना परत देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात संपादित जमिनींची तात्काळ चौकशी करून वापरात नसलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात, संबंधित शेतकऱ्यांची सुनावणी घ्यावी तसेच या प्रकरणी विशेष समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणामुळे तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बातमी देणारे : शिवाभाऊ बोबडे, तीर्थपुरी शहर न्यूज प्रसारण रिपोर्टर

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























