तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे
तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांना सध्या युरिया खतासाठी मोठी धावपळ करावी लागत असून, कृषी सेवा केंद्र चालकांकडून खताचा साठा बाहेर जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही छायाचित्रांमध्ये ट्रकमधून मोठ्या प्रमाणात युरिया खताची वाहतूक होत असल्याचे दिसत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पेरणीपूर्व काळात खताची मोठी गरज असताना स्थानिक शेतकऱ्यांना “स्टॉक नाही” असे सांगितले जाते. मात्र दुसरीकडे ट्रकभर खत बाहेर जिल्ह्यात पाठवले जात असल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार केला जात असल्याची चर्चा रंगली आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांना जादा दराने खत खरेदी करावे लागत असून आर्थिक फटका बसत आहे. प्रशासनाने तात्काळ तपास करून संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
“शेतकऱ्यांच्या हक्काचे खत शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे. आता कृषी विभाग व स्थानिक प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























