देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत
फुलगाव (प्रतिनिधी गौतम पाटोळे) भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे फुलगाव व परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. “ओम श्री साईराम”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. श्री सत्यसाई सेवा संघटना, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रथयात्रेत हजारो साईभक्तांनी सहभाग नोंदविला.
भगवान श्री सत्यसाईबाबांच्या पवित्र पादुका, आकर्षक फुलांची सजावट आणि भक्तिमय वातावरणाने सजलेला रथ गावागावांतून फिरला. रथयात्रेच्या स्वागतासाठी ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अनेकांनी श्री सत्यसाईबाबांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले.
रथयात्रेदरम्यान “सर्वांची सेवा करा, सर्वांना मदत करा, कोणालाही दुःखवू नका” हा श्री सत्यसाईबाबांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आला. प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र असतात, जीवनातील प्रेम, करुणा, सहकार्य आणि मानवसेवेचे महत्त्व यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
रथयात्रेचे अनेक गावांत उत्साहात स्वागत
श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेने पुणे जिल्ह्यातील शिरवळ, केतकावळे, श्रीक्षेत्र नारायणपूर, वीर, बहिरवाडी, कात्रज, हडपसर, नांदेडफाटा, पाषाण, टेकवडे, कुरण खुर्द, मांदरी, रुळे, खामगाव, आव्हाळवाडी, कोरेगाव, रांजणी, माळवाडी, डोणजे, वसववाडी, गोरे खुर्द, पिंपरी चिंचवड, श्रीक्षेत्र देहू, मोशी, चोविसावाडी आणि श्रीक्षेत्र आळंदी देवाची अशा विविध ठिकाणी आगमन करून भक्तांना दर्शन दिले.
आळंदीत हरिनामाच्या गजरात स्वागत
ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथे रथयात्रेचे विशेष स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, टाळ-मृदंगाच्या गजरात, दिंडी, भजन आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी श्री सत्यसाईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
फुलगाव येथे आयोजित कार्यक्रमात कीर्तन, भजन, महाप्रसाद वितरण आणि साईभजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री श्री सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र (फुलगाव) येथे साईभजन, आरती आणि जागर कार्यक्रमाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास भाजप पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अरुणभाऊ चौधरी, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सत्यसाई सेवा संघटना पश्चिम महाराष्ट्रचे राज्य प्रमुख सुभाष चोरे, राज्य सल्लागार प्रमुख दिलीप भागे, जिल्हाध्यक्ष गिरीश लेले तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आळंदी व लोणीकंद पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
मानव मित्र न्यूज अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा YouTube Manav Mitra news YouTube channel

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























