मानव मित्र न्यूज संपादक रवी कदम
✍️ मराठी तरुण पिढीला आत्मचिंतनाचा संदेश
आज महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात फिरताना एक अस्वस्थ करणारे चित्र वारंवार समोर येते. कष्ट, शिक्षण, उद्योग आणि दूरदृष्टी याऐवजी काही ठराविक चुकीच्या सवयींमध्ये अडकलेला मराठी तरुण समाज स्वतःच्या अधोगतीला नकळत कारणीभूत ठरत आहे, अशी खंत अनेक जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.
दारू, दादागिरी, हफ्तेबाजी, बेकायदेशीर धंदे, राजकीय गुंडगिरी, तोडफोडीचे आंदोलन, वर्गणीवर अवलंबून असलेले सण-समारंभ, आमदार-खासदारांच्या दारात उभं राहून सहली काढण्याची मानसिकता – यालाच यश आणि शौर्य समजण्याची धोकादायक प्रवृत्ती समाजात वाढताना दिसते.
स्वतःची रिक्षा, टॅक्सी, वडापावची गाडी किंवा प्रॉपर्टी परप्रांतीयांना भाड्याने देऊन आपण केवळ दलालीवर समाधान मानतो; मात्र तेच परप्रांतीय हे उद्योग स्वतःच्या कष्टाने उभे करून पुढे जातात. आपण सोडून दिलेली मेहनतीची कामे ते स्वीकारतात, बचत करतात, मुलांच्या शिक्षणावर लक्ष देतात आणि भविष्य सुरक्षित करतात.
नोकरी लागल्यानंतर काम न करता वाद, शिवीगाळ, दमदाटी करून “भाई” म्हणून नाव कमावणे हे यशाचे मापदंड बनले आहेत का, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे. गावठी हातभट्टी, मटका, गुटखा, गांजा, चरस यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांच्या आसपास फिरणे आणि अंगावर पोलीस केसेस करून घेणे यालाच धाडस समजले जात आहे.
या सगळ्यात खरी शोकांतिका अशी की, जर या सर्व गोष्टी करून वेळ उरला तरच प्रगतीचा विचार केला जातो. परिणामी समाज मागे पडतो, आणि दोष मात्र परप्रांतीयांवर ढकलला जातो. पण प्रश्न असा आहे की, मेहनत, शिस्त आणि भविष्याचा विचार करणाऱ्या माणसाला चुकीचे तरी कसे म्हणता येईल?
आज गरज आहे ती दोषारोपांची नाही, तर आत्मपरीक्षणाची.
मराठी तरुणांनी पुन्हा एकदा शिक्षण, कौशल्य, उद्योग, प्रामाणिक मेहनत आणि स्वाभिमान या मूल्यांकडे वळण्याची गरज आहे. राजकीय भाडे बनण्याऐवजी स्वतःचा मार्ग घडवला, तरच मराठी माणूस पुन्हा उभा राहू शकतो.
ही टीका नसून इशारा आहे.
आज बदललो नाही, तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
– मराठी तरुण पिढीसाठी एक जागरूक संदेश

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























