पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान होणार आहे. आषाढी वारी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात सुमारे १२५ हून अधिक दिंड्या सहभागी होणार असून तब्बल १८० किलोमीटरचा तेरा दिवसांचा प्रवास पार पडणार आहे. भक्ती, परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापनाचा सुंदर संगम यंदाच्या वारीत अनुभवायला मिळणार असल्याची माहिती प्रमुख त्रिगुणी गोसावी यांनी दिली.
यंदाच्या वारीसाठी प्रशासन आणि स्थानिक संस्थांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, डिजिटल नियंत्रण व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य सेवा तसेच सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो वारकरी भक्तांना सुरक्षित, सुसज्ज आणि सुखकर वारीचा अनुभव मिळणार आहे.
वारीतील प्रमुख धार्मिक सोहळ्यांमध्ये १५ जुलै रोजी वाघाळवाडी येथे पहिले रिंगण, १८ जुलै रोजी पिंपळी येथे गोल रिंगण आणि १३ जुलै रोजी वाखरी येथे भव्य उभे रिंगण पार पडणार आहे. तसेच १३ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांची पारंपरिक बंधू भेट हा सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरणार आहे.
१४ जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होऊन ४ ऑगस्ट रोजी पालखी पुन्हा सासवडमध्ये आगमन करणार आहे.
वारीमुळे स्थानिक व्यापार, लघुउद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून “स्वच्छ सासवड, सुंदर सासवड” या संकल्पनेतून पर्यावरणपूरक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. सासवडच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा हा पालखी सोहळा ठरणार असल्याची भावना वारकरी आणि नागरिकांनी व्यक्त केली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























