मुंबई | (मानव मित्र न्यूज अशोक कुंभार)
राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या घरबांधणीसाठी तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांचा अग्रीम निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराची वाट पाहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील पोलिस दल हे २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असते. सण-उत्सव, आंदोलन, निवडणुका किंवा आपत्तीजनक परिस्थितीत पोलिस आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र अनेक पोलिस कर्मचारी आजही भाड्याच्या घरात किंवा अपुऱ्या सुविधांमध्ये राहत असल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निधीमुळे राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांसाठी आधुनिक व सुसज्ज घरे उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचे पोलिस दलातून स्वागत होत असून, “आता तरी हक्काचे घर मिळण्याची आशा निर्माण झाली,” अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























