आळंदी ,(प्रतिनिधी रोहिदास कदम) शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अव्यवस्थित पार्किंग आणि मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता स्वच्छ, सुंदर, हरित आणि वाहतूक कोंडीमुक्त अलंकापुरी अभियानाचे प्रवर्तक तथा आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला जनहितार्थ महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
मेदनकर यांनी सांगितले की, केवळ दंडात्मक कारवाई करून वाहने हटविणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. वाहनचालकांना योग्य पर्याय आणि नियोजन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मंदिर परिसरातील पायऱ्यांजवळ बॅरिकेट्सच्या सहाय्याने वाहन नियंत्रण केले जाते. मात्र बॅरिकेट्स नसल्यास भाविक थेट पायऱ्यांकडे उतरतात आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे नगरपरिषदेकडून भागीरथी नाल्यावर पर्यायी पार्किंगची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाहनधारकांना त्या ठिकाणी सहज पोहोचता यावे यासाठी मार्गदर्शक फलक लावणे, “मोफत पार्किंग”ची माहिती दर्शविणारे बोर्ड उभारणे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच भागीरथी नाला परिसर स्वच्छ ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे. पार्किंगसाठी नागरिकांचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी नियमित स्वच्छता, कचरा निर्मूलन आणि परिसराचे सुशोभीकरण सातत्याने केले पाहिजे, असेही मेदनकर यांनी नमूद केले.
“स्वच्छता, सुयोग्य वाहतूक नियोजन आणि नागरिकांचा सहभाग यामुळेच आळंदी शहर अधिक सुंदर आणि भाविकांसाठी सुलभ होईल,” असे मत अर्जुन मेदनकर यांनी व्यक्त केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























