🕉️
श्रीगुरु हैबतबाबा पायरी पूजनाने धार्मिक प्रथांचा अनोखा संगम
आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ वर थंडीसह आचारसंहितेचे सावट
आळंदी (प्रतिनिधी 🙁 रविदास कदम )
आळंदी नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचा शुभारंभ आज हरिनामाच्या गजरात, श्री गुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने झाला. वेदमंत्रांच्या जयघोषात आणि वारकरी परंपरेच्या भक्तिभावात हा धार्मिक सोहळा पार पडला.
महाद्वारात पारंपरिक विधीनुसार श्री गुरु हैबतबाबा पायरीचे पूजन पुजारी अमोल गांधी आणि काका कुलकर्णी यांनी वेदमंत्र पठणासह केले. या पूजनात दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तर आणि नववस्त्र अर्पण करून श्रींची आरती व पसायदान करण्यात आले.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आणि ऋषिकेश आरफळकर, तसेच आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, डॉ. भावार्थ देखणे, राजेंद्र उमाप, विष्णू तापकीर, अर्जुन मेदनकर, मुख्याधिकारी माधव केंद्रे, भिमा नरके (पोलीस निरीक्षक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पायरी पूजनानंतर मंदिरात अभंग, भजन आणि हरीजागराचा निनाद घुमला. या निमित्ताने भाविक आणि वारकरींना महाप्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग, आळंदी स्वकाम सेवा मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांकडून पिण्याचे पाणी, खिचडी, आणि स्वच्छता सेवा पुरविण्यात येत आहे.
तसेच, संध्याकाळी वीणा मंडपात योगिराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांच्या कीर्तन सेवा आणि रात्री हैबतबाबा पायरीपुढे वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर महाराज यांच्या हरीजागर सेवेने वातावरण भक्तिमय झाले.
दरम्यान, पंढरपूरहून श्री पांडुरंगरायांची पालखी आणि श्री संत नामदेवरायांचा पालखी सोहळा आळंदीत दाखल झाला. शहरात हरिनाम गजरात मनाचे पालखी सोहळे आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
आळंदी नगरी भक्तिभावाने उजळली असून संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून हजारो वारकरी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























