(आळंदी प्रतिनिधी रविदास कदम )
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी संयोजकांना आवाहन; लवकरच संयुक्त बैठकीत अंतिम निर्णय
आळंदी येथे विविध उत्सव, जयंती दिनी निघणाऱ्या मिरवणुका पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात पार पडत असतात. मात्र ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुका डीजे मुक्त व्हाव्यात, याबाबत आळंदी शांतता कमेटीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
अनेक वेळा पोलीस प्रशासन व स्थानिक पदाधिकारी यांच्या आवाहनानंतर काही मिरवणुका डीजे मुक्त पार पडल्या असून, हा आदर्श पुढेही कायम राहावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. सर्व मिरवणुका आणि उत्सव डीजे मुक्त करण्याबाबत लवकरच सर्वसमावेशक संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
आळंदी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, उत्तमराव गोगावले, अर्जुन मेदनकर, मंगेश तिताडे, अजित वडगावकर, अॅड. नाझीम शेख, सोहेल शेख, आरीफ शेख, हमीद शेख, इम्रान हकीम, निसार सय्यद यांच्यासह शांतता कमेटी सदस्य आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
येत्या गुढी पाडवा, रमजान ईद, श्री राम नवमी, हनुमान जयंती, भगवान महावीर जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, मिरवणुकीचे मार्ग, पोलीस बंदोबस्त याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांनी सांगितले की, आळंदीत अनेक मिरवणुका आधीच डीजे मुक्त होत असून, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मिरवणुका आता वेळेआधीच समाप्त केल्या जात आहेत. या उपक्रमास स्थानिक पदाधिकारी, शांतता कमेटी सदस्य आणि पोलीस यांचे सहकार्य लाभत आहे.
आळंदीतील डीजे मुक्त मिरवणुकांचा आदर्श पंचक्रोशीतील इतर गावांनीही घेतला असून, अनेक ठिकाणी अशा प्रकारे शांततेत उत्सव साजरे केले जात आहेत.
पुढील काळात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्व मिरवणुका, उत्सव आणि कार्यक्रम डीजे मुक्त व्हावेत, असे आवाहन शांतता कमेटीच्या वतीने सर्व संयोजकांना करण्यात आले. बैठकीचे संयोजन पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी केले

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















