आळंदी देवाची (प्रतिनिधी: रविदास बबन कदम)
महाराष्ट्राची वैभवशाली वारकरी परंपरा आता सातासमुद्रापार पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी लंडनसह तब्बल ११ देशांतील विठ्ठलभक्त आणि वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून सुमारे ५० दिवसांच्या या आध्यात्मिक प्रवासाची तयारी सुरू झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबद्दल परदेशातही मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. विविध देशांतील भाविक वारकरी परंपरेचा अनुभव घेण्यासाठी, अभंग-भजनाच्या माध्यमातून विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत.
वारकरी संप्रदायाचा समतेचा, भक्तीचा आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचत असून परदेशी नागरिकही या परंपरेशी जोडले जात आहेत. त्यामुळे यंदाची आषाढी वारी अधिक वैश्विक स्वरूपाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. यावर्षी परदेशातील वारकऱ्यांच्या वाढत्या सहभागामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेची कीर्ती जागतिक स्तरावर अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.
आषाढी वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि भक्तीभाव जपणारा महोत्सव आहे. जगभरातील विठ्ठलभक्तांच्या सहभागामुळे यंदाची वारी विशेष ठरणार असल्याची भावना वारकरी संप्रदायातून व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























