प्रतिनिधी राहुल बोबडे
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा विभागीय साखर संकुल आयुक्त यांना निवेदन देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या रकमा तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक साखर कारखान्यांकडे ऊस बागायतदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. संबंधित साखर कारखान्यांची आरआरसी (RRC) अंतर्गत चौकशी करून थकीत रक्कम वसूल करण्यात यावी व ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. ऊस उत्पादकांच्या न्याय्य हक्काच्या रकमा लवकरात लवकर मिळाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन स्वीकारताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.
प्रतिनिधी राहुल बोबडे
मानव मित्र न्यूज

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























