पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम)
Alandi : आळंदी नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चऱ्होली खुर्द येथील गायरान जमिनीपैकी तब्बल पाच एकर जागा करार करून उपलब्ध करून दिली होती. मात्र आता या जागेच्या वापराबाबत करण्यात आलेल्या अटी व शर्तींचा भंग होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा डेपो परिसरात नियोजनाचा अभाव असून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. देवस्थानने धार्मिक आणि सामाजिक हित लक्षात घेऊन जागा उपलब्ध करून दिली होती, मात्र प्रत्यक्षात त्या जागेचा वापर करारातील नियमांनुसार होत नसल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीच्या पवित्र वातावरणावरही या प्रकारामुळे परिणाम होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. “देवस्थान प्रशासनाने या प्रकरणात गंभीर दखल घ्यावी, करारातील अटींची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी,” अशी मागणी आता पुढे येत आहे.
दरम्यान, नगरपरिषद आणि संबंधित प्रशासन यांच्याकडून याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र घनकचरा डेपोचा मुद्दा पुन्हा एकदा आळंदीत चर्चेचा आणि संतापाचा विषय बनला आहे. https://youtube.com/shorts/Bal7RU6XxAQ?si=DwF7zE6HyP33RY_u अधिक माहिती जाणून घेण्यासाठी युट्युब वर लिंक सर्च करा मानवमित्र.न्यूज ….

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























