आळंदी |संपादक रोहिदास कदम
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू, तर सात वारकरी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभेने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या पायी वारीतील दिंडीवर ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तीन निष्पाप वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायासह हिंदू समाजात शोककळा पसरली आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंधळ आणि पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप तसेच पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांना निवेदन देऊन पीडित वारकरी कुटुंबांना तातडीने भरीव मदत करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मृत वारकरी हे सामान्य कुटुंबातील असून अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने वारीत सहभागी झाले होते. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबांचा आधार हिरावला गेला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत शासन आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पीडित कुटुंबांना तातडीने मदत करावी.
प्रमुख मागण्या
मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.
प्रत्येक मृत वारकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी.
जखमी सात वारकऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा.
उपचारानंतर पुढील सहा महिन्यांचा खर्च श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी करावा.
वारी मार्गावरील पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
या मागणीस अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय संरक्षक श्री श्री १००८ जगद्गुरु स्वामी माधवानंद सरस्वतीजी महाराज, राष्ट्रीय धर्मप्रचारक श्रीमंत शिवनाथजी महाराज, योगी आनंद दादानाथजी, बालयोगी ऋषिकेशनाथजी, मोहन सदचिदानंदजी सरस्वती, महंत योगानंद सरस्वती, महंत केशवानंद सरस्वती, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेंद्र वर्मा आणि राष्ट्रीय महामंत्री डॉ. सिद्धार्थ भट्टाचार्य यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेऊन पीडित कुटुंबांना न्याय द्यावा, अन्यथा अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























