आळंदी, दि. १२ (प्रतिनिधी सचिन शिंदे)
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. “सर्व संतांचे समाधी सोहळे व पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्रित साजरी करावी” या स्तुत्य संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाले.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचे अभ्यासपूर्ण आणि रसाळ कीर्तन ठरले. आपल्या निरूपणातून त्यांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत मुक्ताबाई, चांगदेव, बिभीषण आणि संत नामदेव महाराज यांच्या भक्तीचे विविध दाखले देत उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजविले. तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरील श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थानाचे आध्यात्मिक महत्त्वही त्यांनी उलगडून सांगितले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (आळंदी), वारकरी सेवा संघ (पुणे) आणि श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था (आळंदी) यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १४ वर्षे हा उपक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे. ह.भ.प. राजाभाऊ चोपदार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभरातील कीर्तनकार आणि वारकरी यांच्यासाठी प्रेरणास्थान बनला आहे.
कार्यक्रमात श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गायक, वादक आणि टाळकरी म्हणून मनःपूर्वक सेवा बजावली. ह.भ.प. मोहन महाराज शिंदे, रवींद्र महाराज कुमकर, साहिल उत्तेकर, राज गोरे आणि पवन लिंगायत यांनी कीर्तनाला सुरेल साथ दिली.
कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी वारकरी सेवा संघाच्या वतीने, “आळंदीप्रमाणेच सर्व संतांच्या देवस्थानांनी आपल्या परिसरात संतांच्या पुण्यतिथी आणि समाधी सोहळे एकत्रितपणे साजरे करून समाजात भक्ती, समता आणि ऐक्याचा संदेश द्यावा,” असे आवाहन करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























