तीर्थपुरी (प्रतिनिधी राहुल बोबडे) तीर्थपुरीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; नागरिकांना धमक्या, शासनालाही लाखोंचा फटका
तीर्थपुरी शहरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. बिना नंबर प्लेटचे डंपर सर्रास रस्त्यावर धावत असून, नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
जागरूक नागरिकांनी संबंधित वाहन चालकांना “गाडीला नंबर प्लेट का नाही?” असा प्रश्न विचारला असता, त्यांना उलट दमदाटी करून मारहाणीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. “प्रश्न विचारू नका, नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशा भाषेत काही जण नागरिकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अनधिकृत गौण खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत आहे. नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पर्यावरणाची हानी, नदीपात्राचे नुकसान आणि शासनाचे आर्थिक नुकसान या तिन्ही बाबी गंभीर असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांनी अनेक वेळा निवेदन देऊन कारवाईची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “उद्या एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























