पुणे : (प्रतिनिधी अशोक कुंभार) राज्यातील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला राज्य शासनाने ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे. भाविकांची वाढती संख्या, मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी उपलब्ध होणार असून परिसराचे सुशोभीकरण, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, रस्ते विकास, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत. तसेच भाविकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्याचे श्रद्धास्थान मानले जाते. गणेशोत्सव काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्याच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, मंदिर परिसराचा विकास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























