पुरंदर सासवड पतिनिधी अशोक कुभांर
पुणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील MIT Art, Design and Technology University येथे अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भगव्या पताकांनी सजलेला परिसर, ढोल-ताशांचा दणदणाट आणि “जय भवानी, जय शिवराय”, “जय शंभूराजे”च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर शिवमय झाला होता.
उर्मिलाताई कराड सभागृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर शिव-शंभू गर्जनांनी वातावरण भारावून गेले. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठीचे अतुलनीय योगदान यावर प्रभावी भाष्य केले.
यावेळी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवराय ढोल-ताशा पथकातील सदस्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमानंतर ‘छावा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे प्रसंग पाहताना विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तर अखेरच्या प्रसंगांमध्ये अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले आणि सभागृह भावूक वातावरणाने भारावून गेले.
प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर आलेली संकटे छत्रपती संभाजी महाराजांनी अतुलनीय धैर्याने पेलली. त्यांच्या चिवट संघर्षामुळेच औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहालाही झुकावे लागले. संभाजी महाराजांमुळेच महाराष्ट्रधर्म टिकून राहिला आणि अधिक बळकट झाला,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























