आळदीदेवाची. संपादक रोहिदास कदम) महिला अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व तपपूर्ती सोहळा निमित्त आयोजित संगीतमय देखाव्यासह शिवपुराण कथेमुळे आळंदी नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. प्रसिद्धकथाचार्य संतोषनंद शास्त्री महाराज यांच्या संस्कृतसंपन्न, ओजस्वी वाणीतील प्रवचनाने संपूर्ण परिसरात अध्यात्मिक चेतना जागृत झाली असून वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
इंद्रायणी घाट परिसरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे “हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा” या नामघोषाने वातावरण दुमदुमले आहे. या भक्तिमय सोहळ्याचे नेतृत्व कमलताई घुंडरे पाटील यांनी समर्थपणे सांभाळले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची भव्यता अधिकच खुलून आली आहे.
दिनांक १७ रोजी शिवपुराण कथेमध्ये भगवान शंकरांच्या विवाहाचा अलौकिक आणि दिव्य प्रसंग संगीतमय देखाव्यासह सादर करण्यात आला. देव, दानव, दैत्य यांच्या पारंपरिक वेशभूषेत वारकरी भाविकांनी सहभाग घेत शंकर विवाहाचा देखावा साकारला. हा देखावा उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला असून भक्तिमय वातावरणात हरिनामाचा अखंड गजर सुरू राहिला.
या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिनांक २० रोजी होणार असून सांगता कार्यक्रमात ह.भ.प. रजनीताई जाधव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ समस्त वारकरी भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























