परतूर / प्रतिनिधी (गजानन.राजबि॓ंडे पाटील)
परतूर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवत नगरपरिषद पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रियंका शहाजी राक्षे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून नगरसेवक पदासाठीही भाजपाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे परतूरच्या राजकारणात भाजपाची पकड अधिक मजबूत झाली आहे.
नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदावर भाजपाचे रत्नमाला सतीश सोनवणे, कुरेशी इजरान मुंशी, अग्रवाल स्नेहा सोनू, चव्हाण प्रकाश पंढरीनाथ, डॉ. प्रदीप सुधाकर सातोंनकर आणि काळे पूजा सावता यांनी विजय मिळवला. निकाल जाहीर होताच शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
ही निवडणूक माजी मंत्री तथा परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. प्रचार काळात आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपाचे प्रदेश सचिव राहुलभैया लोणीकर यांनी सर्व प्रभागांमध्ये सभा, कॉर्नर बैठका आणि घराघरात जाऊन प्रचार केला. विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांनी भाजपाला स्पष्ट कौल दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत विक्रमी मतदानाची नोंद झाली. एकूण 33,096 मतदारांपैकी 23,272 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 70.32 इतकी राहिली. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
प्रचारादरम्यान भाजपाने परतूर शहरासाठी गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला होता. नगरपरिषदेची सत्ता नसतानाही परतूरसाठी 800 कोटी रुपयांहून अधिक निधी आणून उड्डाणपूल, नाट्यगृह, वसतिगृह, क्रीडा संकुल, नगरपरिषद इमारत, स्मशानभूमी विकास तसेच पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच सत्ता मिळाल्यास प्रलंबित कामे पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या 30 कोटी रुपयांच्या भव्य उद्यानाच्या घोषणेनेही शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि नागरी सुविधा या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे भाजपाने जाहीर केले होते.
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रियंका शहाजी राक्षे यांनी परतूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पाणी, स्वच्छता, रस्ते आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या निकालामुळे परतूर नगरपरिषदेत भाजपाची सत्ता भक्कम झाली असून येत्या काळात शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम

























