लग्नातील ‘व्हीआयपी’ स्वागत पद्धतीवर प्रश्नचिन्ह; पाहुण्यांच्या वेळेचा अनादर होत असल्याची नाराजी
( पुरंदर सासवड प्रतिनिधी | अशोक कुंभार ,)
सध्या विवाह सोहळ्यांमध्ये काही मोजक्या प्रतिष्ठित, श्रीमंत किंवा राजकीय व्यक्तींचेच स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत वाढत असल्याने समाजात नाराजी व्यक्त होत आहे. निमंत्रण देऊन सर्वांना बोलावले जाते; मात्र कार्यक्रमात फक्त काहींचाच सत्कार होत असल्याने इतर पाहुण्यांचा अप्रत्यक्षपणे अपमान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, लग्नाच्या वेळेबाबतही पाहुण्यांच्या वेळेचा अनादर होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक वेळा निमंत्रण पत्रिकेत संध्याकाळी ७ वाजता मुहूर्त दिला जातो; मात्र प्रत्यक्षात लग्न सोहळा रात्री ९ वाजता किंवा त्यानंतर सुरू होतो. त्यामुळे पाहुणे मंडळी एक-एक तास हॉलमध्ये बसून वाट पाहत असतात. वृद्ध, महिला, लहान मुले आणि दूरवरून आलेल्या पाहुण्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ⏰
विवाह सोहळ्यासाठी वेळ काढून आलेले नातेवाईक, मित्रपरिवार व समाजबांधव हेही तेवढेच महत्त्वाचे असतात. विशेषतः आर्थिकदृष्ट्या साधारण असलेले पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहणारे आप्तेष्ट दुर्लक्षित होत असल्याचे अनेकांचे मत आहे.
काही वेळा मोठे मान्यवर केवळ फेटा, पुष्पगुच्छ व फोटोसाठी येतात आणि पुढील कार्यक्रमाचे कारण देत जेवण न करता निघून जातात. त्यामुळे लग्नातील अन्नाचा अपमान होतो तसेच उपस्थित राहिलेल्या इतर पाहुण्यांमध्ये नाराजी निर्माण होते, अशीही टीका होत आहे.
त्याऐवजी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित सर्व पाहुण्यांचे एकत्रित स्वागत करून विवाह विधी नियोजित वेळेत पार पाडावेत, अशी सूचना नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्यांचा स्वतंत्र सत्कार झाला नाही म्हणून नाराज होण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
ही ‘व्हीआयपी स्वागत’ पद्धत बंद करून सर्व पाहुण्यांना समान सन्मान देण्याची मागणी आता समाजातून जोर धरू लागली आहे. 🤝

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















