आळंदी / वार्ताहर :८ रविदास कदम)
भागवत एकादशी (पापमोचनी) निमित्त आळंदी येथील माऊली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली. दिवसभर हरिनाम गजरात सुमारे ५० हजारांहून अधिक भाविकांनी श्री माऊलींचे दर्शन घेतले. परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांनी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. . . 
एकादशीच्या दिवशी पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात श्रींच्या गाभाऱ्यात पवमान अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आल्याने श्रींचे रूप अत्यंत मनमोहक दिसत होते. भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावत हरिनाम गजरात दर्शन घेतले तसेच नगरप्रदक्षिणाही केली.
दुपारी फराळाचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने देहूकर यांच्या तर्फे परंपरेने कीर्तन सेवा पार पडली. सायंकाळी आणि रात्री मंदिरात आरती आणि इतर धार्मिक विधी संपन्न झाले. दर्शनापूर्वी अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नान करून दर्शन घेतले.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पोलिसांनी योग्य नियोजन करून भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त सांभाळला. तसेच आळंदी-दिघी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचे नियोजन केल्याने भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला.
मात्र दुचाकी वाहनांवर होत असलेल्या दंडात्मक कारवाईबाबत काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली. प्रथम पार्किंगची पुरेशी व्यवस्था करून नंतरच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
इंद्रायणी नदी घाटावर आरतीचा भक्तिमय सोहळा
भागवत एकादशी निमित्त आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची भव्य आरती करण्यात आली. सकाळी नगरपरिषदेच्या वतीने नदी घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली.
इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट, महिला मंडळ तसेच ग्रामस्थ यांच्या सहभागाने हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. 
इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा नियोजन विभागाला निवेदन देण्यात आले असून आळंदी नगरपरिषदेला कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरती प्रसंगी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम, सुवर्णाताई काळे, कौशल्या देवरे, विद्या आढाव, शकुंतला चोपडे, दमयंती आर्दड, मेघा काळे यांच्यासह अनेक महिला भाविक उपस्थित होत्या.
तसेच आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने आणि आळंदी नगरपरिषदेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























