पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार
मिळालेल्या माहिती अनुषंगाने.परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्त संप्रदायाचे ज्येष्ठ संत परमपूज्य कालिदास महाराज यांचे छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही मृत्यू झाला असून वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. या दुःखद घटनेमुळे श्रीक्षेत्र गुंजसह संपूर्ण मराठवाड्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंबे स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर्शनासाठी कालिदास महाराज श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या सहकाऱ्यांसह श्रीक्षेत्र गुंजकडे परतत असताना बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की कालिदास महाराज आणि स्मिता बोरीकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेली अनेक दशके मौनव्रताचे पालन करणारे कालिदास महाराज हे दत्त संप्रदायातील आदरणीय संत म्हणून ओळखले जात होते. अध्यात्म, व्यसनमुक्ती, समाजप्रबोधन आणि मानवसेवा यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते. त्यांच्या प्रवचनांमधून आणि सेवाभावी कार्यातून हजारो भाविकांना प्रेरणा मिळाली होती.
कालिदास महाराज यांच्या निधनाची वार्ता समजताच श्रीक्षेत्र गुंज येथे भाविकांनी मोठी गर्दी केली. विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने दत्त संप्रदायाची मोठी हानी झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























