खेड (पुणे): प्रतिनिधी रविदास कदम/
पैशांचा पाऊस पाडून देतो, संकटे दूर करतो तसेच अघोरी व तांत्रिक विधी करून आर्थिक लाभ करून देतो, असा दावा करत नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीस खेड येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सदर आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी प्रतिबंध व निर्मूलन तसेच इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम, २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदारास तांत्रिक विधी, जादूटोणा व अघोरी प्रथा करून पैशांचा पाऊस पडेल, आर्थिक लाभ होईल तसेच विविध संकटे दूर होतील, असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आरोपीवर आहे.
अटक झाल्यानंतर आरोपीस दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या वतीने अॅड. अभिषेक संदीप रंधवे व अॅड. रोहन आठवले यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीस पोलीस कोठडीची आवश्यकता नसून, तपास प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीस अटक झालेल्याच दिवशी जामीन मंजूर केला. या प्रकरणात ज्येष्ठ वकील अॅड. रोहन आठवले यांचे मार्गदर्शन लाभले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























