:पांगारे (ता. पुरंदर) | प्रतिनिधी अशोक कुंभार
पांगारे येथील शेतकऱ्यांची पोलिसांकडे तक्रार; पंधरा वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा दावा.
पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील डोंगरभागातील शेलार वस्ती येथे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ३५८ मधील पंधरा वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या चार पाईपलाईन ट्रॅक्टरच्या सहाय्याने फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ३५८ हा उत्तम किसन शेलार यांचा सामायिक गट असून या गटातून त्रिंबक भिकोबा शेलार, संजय यशवंत शेलार, सतपाल काळूराम शेलार आणि सिताराम हरिभाऊ शेलार यांच्या शेतीसाठी पाईपलाईन टाकण्यात आल्या होत्या. या पाईपलाईन १२ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने फोडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात तुषार उत्तम शेलार यांच्यावर आरोप करण्यात आला असून संबंधित ट्रॅक्टर मालकासह जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असल्याचेही सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पाईपलाईनचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम शेती आणि सिंचनावर होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
टीप : या वृत्तातील आरोप तक्रारदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू असून अंतिम निष्कर्ष तपासानंतर स्पष्ट होईल.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























