बातमी:(पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार,)
पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे दिनांक १३ मार्च २०२६ रोजी लागलेल्या वनव्यात स्थानिक शेतकरी ओंकार संदिप काकडे यांच्या आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या त्यांच्या बागेत एकूण ८० आंब्याची झाडे असून त्यापैकी १३ झाडे आगीत जळून खाक झाली आहेत.
शेतकरी काकडे यांनी सांगितले की, त्यांनी संपूर्ण उन्हाळाभर टँकरने पाणी देऊन बाग जपली होती. याशिवाय दोन बोअरवेलही केले होते, मात्र ते दोन्ही अपयशी ठरले. या सर्व परिस्थितीमुळे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
या घटनेनंतर काकडे यांनी शासनाकडे तात्काळ नुकसानभरपाई व मदतीची मागणी केली आहे. “आमची परिस्थिती अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर कठोर पाऊल उचलण्याची वेळ येईल,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडूनही केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























