पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे चैत्र एकादशीच्या दिवशी दाखवण्यात आलेल्या पुरणपोळीच्या नैवेद्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.
चैत्र एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. “लोकांना निर्जळ एकादशी करण्यास सांगितले जाते, मात्र विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला जातो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकादशीच्या दिवशी उपवासाचे धार्मिक महत्त्व असल्याने गोड व जड पदार्थाचा नैवेद्य दाखवणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडताना दाखवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेनंतर वारकरी संप्रदायात चर्चेला उधाण आले असून भाविकांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर मंदिर प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























