सासवड वार्ताहर
आळंदी म्हातोबा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याने आळंदी शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेनंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आळंदी देवाची परिसरात एकत्र येत जाहीर निषेध आंदोलन केले. यावेळी “लोकशाहीत विरोध असू शकतो, मात्र शाईफेक आणि अपमानास्पद प्रकार योग्य नाहीत,” अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, काँग्रेस शहराध्यक्ष संदीप नाईकरे, संजय वडगावकर, काळुराम येळवंडे, योगीराज सातपुते, विश्वंभर शिंदे, पितळी गणपती देवस्थानचे सुदीप गरुड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दुसरीकडे, संध्याकाळी महाद्वार चौकात वारकरी संप्रदायातील महाराज, ग्रामस्थ आणि भाविकांनी स्वतंत्र निषेध व्यक्त केला. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय व गुरुवर्यांविषयी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे भावना दुखावल्याचा आरोप करत, संग्राम भंडारे यांच्या भूमिकेला समर्थन देण्यात आले.
यावेळी उपसरपंच किरण मुंगसे, गणेश गरुड, संदीप महाराज लोहार, संतोषानंद महाराज शास्त्री आदी उपस्थित होते. “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा आहे. गुरुवर्यांचा अवमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा उपस्थित महाराजांनी दिला.
आळंदी आणि केळगाव परिसरातील भाविक, महाराज आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे शहरात राजकीय आणि धार्मिक वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























