पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार)
वडगाव तालुक्यातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (ESR) मोहिमेदरम्यान काही ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त बीएलओ (BLO) यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न करता मतदारांना ग्रामपंचायत कार्यालय, शाळा किंवा इतर ठिकाणी बोलावून अर्ज भरून घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटस परिसरातील मतदारांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, आयोगाच्या निर्देशानुसार बीएलओंनी घरपोच जाऊन मतदारांकडून अर्ज भरून घेणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिवसभर मजुरी करणारे कामगार आणि इतर अनेक मतदार नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे.नागरिकांना आवाहन करते की, आपल्या परिसरातील BLO फोन उचलत नसल्यास त्याची माहिती संबंधित तहसील कार्यालय किंवा निवडणूक शाखेकडे लेखी स्वरूपात द्यावी.
तक्रारदारांनी संबंधित निष्काळजी बीएलओंवर निलंबनाची कारवाई करण्याची, ईएसआर प्रक्रिया शंभर टक्के घरपोच पूर्ण करण्याची तसेच वंचित राहिलेल्या मतदारांसाठी पुन्हा विशेष नोंदणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
लोकशाहीतील मतदानाचा मूलभूत अधिकार अबाधित राहावा आणि एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून त्याची प्रत उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























