पुरंदर (प्रतिनिधी अशोक कुमार): जेजुरी येथील इनाम वर्ग ६ ब महारवतन गट नं. १३६ मधील शेतजमिनीवर बेकायदेशीर गुंठेवारी विक्री करून उभारण्यात आलेली पक्की बांधकामे तात्काळ निष्काशीत करण्यात यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी भालेराव यांनी केली असून या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोमवार (दि. १६ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी ११ वाजता जेजुरी नगरपालिकेसमोर हे उपोषण सुरू करण्यात आले. संबंधित जमिनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लॉट विक्री करून घरे बांधण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच आनंदनगर येथील दलितवस्ती सुधार योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जेजुरी नगरपरिषद घनकचरा प्रकल्प योजनेतही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनास रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले, माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव, प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप, तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार, शहराध्यक्ष रणजित भालेराव, युवानेते अनिकेत भालेराव, नवनिर्वाचित नगरसेवक तानाजी खोमणे, संतोष खोमणे तसेच भाऊ बनसोडे, काळू सरोदे, प्रितम आठवले, भिमसेन भालेराव, विनोद सोनवणे, सचिन भालेराव, नितीन सोनवणे, गणेश गाढवे, निखील गंगावणे, ओंकार चव्हाण आदींनी पाठिंबा दिला आहे.
संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते तानाजी भालेराव यांनी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























