वार्ताहर – मानव मित्र न्यूज अशोक कुंभार
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश देणारे ‘ऑक्सिजन रिक्षावाला’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन विलास पाटील यांच्याशी मानव मित्र न्यूजने खास संवाद साधला.
यावेळी मिथुन पाटील म्हणाले, “मी सुमारे तीन लाख रुपये खर्च करून ही रिक्षा केवळ वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी तयार केली आहे. मी जिथे जाईन तिथे वृक्ष लावतो आणि लावलेली झाडे लहान मुलांप्रमाणे जपतो.”
ते पुढे म्हणाले, “वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. पावसाचे प्रमाणही कमी होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. वृक्षवल्ली जोपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.”
मिथुन पाटील यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांत त्यांनी २० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली असून भविष्यातही हा पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम अविरत सुरू ठेवणार आहेत.
त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, अधिकाधिक लोकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























