(आळंदी प्रतिनिधी रवी कदम) पुणे आळंदी रोडवरील धाकटे पादुका ते देहू फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची प्रचंड गर्दी आणि अतिजलद वाहने यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी दोन ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे आणि काही ठिकाणी डिव्हायडर उघडून रस्ता पार करण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आले की, हा रस्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे आणि या मार्गाच्या विकास आराखड्यातील कामांसाठी महानगरपालिकेला निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित विभागाकडूनच पुढील कामकाज होणार असल्याचे कळते.
नागरिकांचा प्रश्न असा आहे की — जबाबदारी कोणाचीही असो, पण जीव धोक्यात घालून रोज रस्ता ओलांडणे हे आता असह्य झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला तातडीने लक्ष देण्याची आणि आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























