(आळंदी प्रतिनिधी रवी कदम) आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ : भाविकांसाठी सेवा-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा — प्रांताधिकारी अनिल दौंडे
कार्तिकी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा यंत्रणा सक्षम: श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त येथील कार्तिकी यात्रा २०२५ साठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व शासकीय विभागांनी सेवा-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी दिले.
आळंदी नगरपरिषद सभागृहात झालेल्या यात्रा नियोजनपूर्व आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली. प्रांताधिकारी दौंडे यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, दर्शनबारी व्यवस्था, वाहतूक नियंत्रण यांसारख्या सेवांवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले.
बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, तसेच विविध विभागांचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी बैठकीचे संचालन करून उपस्थितांचे स्वागत केले.
🚦 प्रशासनाची तयारी
यात्रेचा कालावधी: १२ ते २० नोव्हेंबर २०२५
अपेक्षित भाविक संख्या: १५ ते २० लाख
पोलीस बंदोबस्त: १५० अधिकारी, ११०० अंमलदार, ६०० अतिरिक्त जवान
आरोग्य सेवा: २४ तास सेवा, ५ ICU बेड, १० वैद्यकीय पथके, १०८ व १०२ रुग्णवाहिका, साथरोग नियंत्रण कक्ष
महावितरण: अखंड वीजपुरवठा व जुन्या तारांची दुरुस्ती
पाटबंधारे विभाग: नदीत १५० क्युससेस क्षमतेने पाणी सोडणे
नगरपरिषद: दर्शनबारी, मंडप, वॉच टॉवर, सीसीटीव्ही, अतिक्रमण निर्मूलन — सर्व कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण
🧘 भाविकांसाठी विशेष सुविधा
जिल्हा परिषद मार्फत १८००, नगरपरिषद मार्फत १००० मोबाईल टॉयलेट्स
शहरात ५ फिलिंग पॉइंट्स, NDRF च्या २ टीम्स, अग्निशमन वाहने
भोजन व्यवस्था व अतिरिक्त विद्युत रोषणाई
रथोत्सवाच्या काळात प्रदक्षिणा मार्गावर जनरेटरद्वारे वीजपुरवठा
🗓️ पुढील बैठक
अंतिम आढावा बैठक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रांताधिकारी दौंडे यांच्या परवानगीने जाहीर केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























