आळंदी प्रतिनिधी माऊली घुंडरे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरीत महिला वारकरी भगिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाला प्राधान्य देणारा ‘आरोग्यदायी आणि स्वच्छता वारी’ हा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. क्षितिज बहुउद्देशीय संस्था आणि नगरपरिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला हजारो महिला वारकरी भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपक्रमांतर्गत महिला वारकरी भगिनींना महिलांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सुमारे १५०० मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. महिलांच्या सोयीसाठी नगरपरिषद आळंदीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट (इन्सिनरेटर) मशीन उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे स्वच्छता व्यवस्थापनाला मोठी मदत झाली.
याचबरोबर आरोग्य विभागामार्फत महिला वारकरी भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती होण्यास हातभार लागला.
दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी श्रीक्षेत्र आळंदीत दाखल होत असतात. अशा मोठ्या धार्मिक सोहळ्यात महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाचा विचार करून राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.
हा उपक्रम नगरपरिषद आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी क्षितिज बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा स्नेहल चौधरी कदम, राजलक्ष्मी पुरुषोत्तमदादा पाटील, संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच नगरपरिषद आळंदीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























