तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना राहुल बोबडे
‘आरोग्य हीच परम संपत्ती’ असा संदेश देणाऱ्या आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या तीर्थपुरी येथील आयुष्मान आरोग्य मंदिराच्या परिसरात सध्या अस्वच्छतेचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. दवाखान्याच्या आवारात साचलेला कचरा, दुर्गंधी आणि साचलेल्या पाण्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दवाखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच परिसरात ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा, वैद्यकीय कचरा व इतर घाण साचलेली दिसून येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे, हे आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, एकीकडे शासन स्वच्छता अभियान, आयुष्मान भारत योजना आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्राची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, राज्यातील अनेक शासकीय रुग्णालये स्वच्छता आणि रुग्णसेवेबाबत आदर्श ठरत असताना तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात अशी परिस्थिती असणे खेदजनक आहे.
मागणी:
संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन परिसराची स्वच्छता करावी तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि रुग्णांकडून करण्यात येत आहे.
Manav Mitra news YouTube channel advance information channel like and share

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























