आळंदी( प्रतिनिधी सचिन शिंदे) पुणे-आळंदी मार्गावरील काळेवाडी, देहूफाटा व वाय जंक्शन परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अतिशय अरुंद असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच रस्त्यालगत उभे असलेले इलेक्ट्रिक पोल, वीज वितरणाचे डीपी आणि विविध बॅनर्स यामुळे उपलब्ध जागा आणखी कमी होत आहे.
परिसरात एका बाजूनेच काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्ता समतोल आणि सुरक्षित करण्याऐवजी काही ठिकाणी रुंदी कमी झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः वाय जंक्शन ते धाकट्या पादुका परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. इलेक्ट्रिक पोल, डीपी आणि अनधिकृत बॅनर्स यामुळे रस्त्यावरील मोकळी जागा अडवली जात आहे.
नागरिकांच्या मते, संबंधित विभागाने रस्त्याच्या कडेला असलेले अडथळे हटवून रस्ता दोन्ही बाजूंनी समतल व एकसमान रुंदीचा करावा. तसेच फुटपाथची व्यवस्था करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
— मानव मित्र न्यूज
प्रतिनिधी सचिन शिंदे आळंदी

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























