जिल्हा जालना घनसावंगी (प्रतिनिधी राहुल बोबडे)
जालना : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सुंध यांनी रात्री १०.३० नंतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे गैरप्रकार तसेच असामाजिक तत्वांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दुकाने, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापना वेळेत बंद झाल्यास रात्रीची अनावश्यक गर्दी कमी होईल. त्यामुळे चोरी, भांडणे, अवैध धंदे, मद्यधुंद अवस्थेतील गोंधळ आणि इतर गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना सोपे होणार आहे.
पोलीस प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून रात्री गस्त वाढवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सामान्य नागरिक, महिला व व्यापारी वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून “या आदेशामुळे शहर अधिक सुरक्षित आणि शांत होईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























