तालुका घनसावंगी (प्रतिनिधी राहुल ज्ञानदेव बोबडे)जालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेनबीर.सिंह संधू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर युवा रयत क्रांती संघटना व मानव मित्र न्यूज डिजिटल मीडिया पत्रकारांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बोबडे व डिजिटल मीडिया रिपोर्टर शिवाभाऊ बोबडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करत तीर्थपुरी परिसरातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. निवेदनानुसार, मागील दीड ते दोन महिन्यांपासून परिसरात चोरी, घरफोडी, जनावरांची चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे, काडतुसे, अवैध वाहतूक अपघात, वाळू उपसा व रस्त्याने अवैध वाहतूक, तसेच जुगार, पत्ते व मटका यांसारख्या अवैध धंद्यांनी मोठा उच्छाद मांडला असून अद्याप ठोस प्रशासकीय कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तरुण पिढीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याने तातडीने कठोर पावले उचलून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन सर्व अवैध धंद्यांवर आळा घालावा व तीर्थपुरी शहराला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी या सर्व बाबींची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत निवेदन जालना येथे संघटना व पत्रकारांच्या वतीने सादर करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























