केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांची माहिती
लोणी–काळभोर (पुणे. प्रतिनिधी अशोक कुंभार):
पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा–मुठा नदीच्या वाढत्या प्रदूषणावर केंद्र सरकार ठोस पावले उचलणार असून, ‘नमामी गंगा’च्या धर्तीवर ‘नमामी मुळा–मुठा’ अशी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी दिली.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र नौदल शिक्षण व प्रशिक्षण अकादमी (मॅनेट) यांच्या कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, नदीत प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी, थेट टाकला जाणारा कचरा आणि औद्योगिक प्रदूषणामुळे मुळा–मुठा नदी गंभीररीत्या दूषित झाली आहे. याचा परिणाम भूजल, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
या पार्श्वभूमीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, अवैध सांडपाणी जोडण्या तोडणे, तसेच प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक घटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलगुणवत्तेचे नियमित निरीक्षण केले जाईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने नदीकाठावरील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
मुळा–मुठा नदीचे संवर्धन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना व युवकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























