आळंदी प्रतिनिधी रविदास कदम)
वारकरी साधकांचा हरिनाम गजरात हरिपाठ; रामरक्षास्तोत्र ग्रंथाचे वाट
येथील श्री आवेकर–भावे श्री रामचंद्र संस्थान, आळंदी (श्री राम मंदिर) यांच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. २२) इंद्रायणी नदी काठावरील श्री राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वेदमंत्रांच्या जयघोषात, पारंपरिक विधी व भक्तिमय वातावरणात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्या मंगलमय दिवसाच्या स्मरणार्थ आळंदीत हरिपाठ, हरिनाम गजर, आरती व धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन करत कार्यक्रम राबविण्यात आले.
या प्रसंगी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. मोहन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील वारकरी साधकांनी हरिपाठ सेवा सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन आवेकर–भावे श्री रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केले. हरिपाठ सेवेचे नियोजन ह. भ. प. रामचंद्र महाराज सारंग व ह. भ. प. रवींद्र भूमकर यांनी केले.
कार्यक्रमास श्रींचे पुजारी महेश अयाचित, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर तौर, आळंदी धाम सेवा संस्थेचे रोहिदास कदम, लक्ष्मण मेदनकर यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
महाराष्ट्र ही संतांची व वारकरी संप्रदायाची भूमी असून येथे धार्मिक व सांस्कृतिक परंपरा मोठ्या श्रद्धेने जपल्या जातात. याच परंपरेनुसार या वर्धापन दिनानिमित्त भाविकांना रामरक्षास्तोत्र या ग्रंथाचे वाटप करण्यात आले तसेच प्रसाद म्हणून लाडूंचे वितरण करण्यात आले.
संस्थानचे अध्यक्ष राहुल आवेकर व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम मंदिरात हा वर्धापन दिन भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























