भोकरदन (जि. जालना) | प्रतिनिधी गजानन राजबिंडे पाटील
भोकरदन तालुक्यातील मोढेकर शहर व परिसरात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या ₹266 प्रति बॅग दराऐवजी ₹400 ते ₹500 दराने युरिया विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या प्रकरणी सुरज पांडुरंग रोडे (रा. जैनपुर कोठारा, ता. भोकरदन) यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काही कृषी सेवा केंद्र चालक व संबंधित अधिकारी–कर्मचारी यांच्या आर्थिक संगनमतामुळेच हा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी योग्य दरात खत मागितल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, गरज असताना खत नाकारले जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तक्रार अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सात दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास 5 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती भोकरदन येथे आमरण उपोषण करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
या तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक दैनिकांना पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, युरिया खताच्या काळाबाजारावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























