श्री संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी
आळंदी, दि. २७ (वार्ताहर सचिन शिंदे)
श्री संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी आळंदी येथे शेकडो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सर्व संतांच्या पुण्यतिथी व समाधी सोहळे एकत्रित साजरे करण्याच्या परंपरेनुसार, ज्ञानेश्वर महाराज मंदिरात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील गुनिजन विद्यार्थी आणि वारकरी मंडळी यांच्या ‘राम कृष्ण हरी’ या मंगल भजनाने कीर्तनास प्रारंभ झाला. सकाळी दहा ते बारा या वेळेत सावर्डेकर महाराज यांनी सुस्वर, प्रभावी कीर्तन सादर केले. रोहिदास महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगत त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.
ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, वारकरी सेवा संघ आणि श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने सर्व संतांच्या पुण्यतिथीचे सोहळे दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरे झाले. विशेष म्हणजे, श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण ह भ प मोहन महाराज शिंदे संस्थेतील विद्यार्थी गेली १४ वर्षे सातत्याने या पुण्यसमाधी सोहळ्यांत सहभागी होत आहेत.
दुपारी बारा वाजता ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ या गजरात पुष्पवृष्टी करून कीर्तनाची सांगता झाली.
कार्यक्रमाला राजाभाऊ चोपदार, चैतन्य महाराज कबीर (पालखी सोहळा), मोहन महाराज शिंदे (अध्यक्ष, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था), माऊली वीर रामचंद्र महाराज सारंग, रवींद्र महाराज कुमकर, पृथ्वीराज कराळे, अशोक सालपे, रामकृष्ण महाराज खाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम भक्ती, हरिनाम आणि संत परंपरेच्या स्मरणाने अत्यंत उत्तमरीत्या पार पडला. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















