पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार ) जेजुरीतील ऐतिहासिक तीर्थस्थळांमुळे पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता
जेजुरी येथील कुलदैवत श्री खंडोबा मंदिर परिसरातील प्राचीन विहिरी, तळे आणि तीर्थस्थळांचा योग्य वापर केल्यास शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी असलेली “फकीराची विहीर” अर्थात पूर्वीची “खटावकर सरदार विहीर”, तसेच जननी तीर्थ, लवथळेश्वर तीर्थ, मल्हार तीर्थ आणि पटांगण परिसरातील तीर्थस्थळांमध्ये उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र अनेक ठिकाणी गाळ साचणे, स्वच्छतेचा अभाव आणि दुर्लक्षामुळे या जलस्रोतांचा पुरेसा उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांच्या मते, नगरपालिका प्रशासनाने या ऐतिहासिक विहिरी व तळ्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि संवर्धन केल्यास त्या पाण्याचा वापर शहरासाठी करता येईल. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा तुटवडा कमी जाणवेल तसेच भविष्यातील पाणी संकटावरही उपाय मिळू शकतो.
इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संगम असलेल्या या प्राचीन जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























