वार्ताहर : सचिन शिंदे) बार्शीमाळ (ता. राजगड-वेल्हे), जि. पुणे | दि. २९ ) तोरणा किल्ल्याच्या कुशीत दुर्गम बार्शीचा माळ हरिनामाच्या गजराने दुमदुमला ७७ वर्षे रस्त्याविना काढलेल्या गावात अखंड हरीनामाची २० वर्षांची परंपरा
ज्या तोरणा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले तोरण बांधून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या ऐतिहासिक तोरणा किल्ल्याच्या कुशीत वसलेले बार्शीचा माळ (ता. वेल्हे) हे गाव आजही अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पूर्ण झाली, तरीही या गावाला अनेक दशकांपर्यंत जाण्यासाठी फक्त पायवाटच उपलब्ध होती.
डोंगरदऱ्या, जंगलातून दोन तासांची पायपीट करून गावात पोहोचावे लागत असे. कोणतेही दळणवळणाचे साधन नसल्याने गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू डोक्यावर वाहून न्याव्या लागत. घर बांधणीपासून दैनंदिन गरजांपर्यंत प्रत्येक गोष्ट कष्टाने करावी लागत होती. पुणे, मुंबई किंवा वेल्हे बाजारात जायचे असल्यास आठ किलोमीटर पायपीट करून डोंगरमाथ्यावर वाहनाची वाट पाहणे, हेच गावकऱ्यांचे नशीब होते.
अशा बिकट परिस्थितीतही या गावात अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा गेल्या २० वर्षांपासून अखंड सुरू आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यक्ष व विद्यार्थी ह.भ.प. मोहन महाराज शिंदे यांनी सर्व अडचणींवर मात करत वीस वर्षांपूर्वी या गावात हरिनाम सप्ताह व कीर्तनाची पेरणी केली.
गावात वीज, टीव्ही, मोबाईल नेटवर्क यांसारखी कोणतीही आधुनिक साधने नसतानाही, “मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या गावात हरिनाम चालू राहील,” असा शब्द देत संस्थेचे विद्यार्थी कोणतेही मानधन न घेता दरवर्षी नियमितपणे या दुर्गम गावात येत राहिले.
ही परिस्थिती पाहून २००७ साली मोहन महाराज शिंदे यांनी संकल्प केला की, “जोपर्यंत या गावात रस्ता होत नाही, तोपर्यंत मी शासनाकडे पाठपुरावा करीन.” त्यानंतर वेल्हे तालुक्यातील वारकरी महामंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला.
या पाठपुराव्याला यश येत मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अवघ्या एका महिन्यात ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून सर्वेक्षण केले आणि सहा महिन्यांत हा छोटासा रस्ता पूर्ण झाला. त्यामुळे आज किमान दोन चाकी व लहान वाहने तरी गावात पोहोचू शकतात.
आज या रस्त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेची बस थेट बार्शीच्या माळात पोहोचली, व आळंदीतील ४० बाल वारकरी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
अखंड हरीनाम सप्ताह
गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ (माघ एकादशी) ते
शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ (माघ द्वादशी)
या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी
ह.भ.प. पांडुरंग महाराज राजूरकर व
ह.भ.प. रामचंद्र महाराज सारंग
यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होत असून,
मृदुंग व गायनासाठी कल्याणी शिंदे, साहिल उत्तेकर, प्रथमेश वायकर, पृथ्वीराज कराळे साथ देत आहेत.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन
ह.भ.प. शिवाजी महाराज पुराणिक
तर विशेष सहकार्य
ह.भ.प. मोहन महाराज शिंदे
यांचे लाभत आहे.
या गावात रस्ता व्हावा यासाठी
ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री,
ह.भ.प. मोहन महाराज शिंदे,
ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कुंभार,
ह.भ.प. बाळकृष्ण महाराज दसवडकर,
ह.भ.प. आनंद बुवा देवगिरकर,
ह.भ.प. किसनराव राऊत
यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती मोहन महाराज शिंदे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ) यांनी दिली.
या अखंड हरीनाम सप्ताहाला बार्शीमाळ येथील महिला भगिनी, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रस्ता, रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, मोबाईल नेटवर्क यांचा अभाव असलेल्या या गावात मानवी जीवाचे मोल प्रशासनाच्या दृष्टीने शून्य आहे का? स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही जर नागरिकांना उपचारासाठी डोंगरदऱ्या ओलांडत जीव मुठीत घेऊन चालावे लागत असेल, तर हा केवळ दुर्लक्ष नव्हे, तर प्रशासनाचा गंभीर अपयशाचा ठपका आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























