
आळंदीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर; अभिवादन सभा संपन्न
आळंदी (रविदास कदम) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आळंदी शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या बुद्ध विहारामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात त्रिशरण पंचशील घेऊन धम्ममय वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष संदीप रंधवे यांनी भूषविले.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, किरण येळवंडे, शिरीष कारेकर, आवाका भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली.
आळंदी येथील तक्षशिला बुद्ध विहारातही अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत दीपप्रज्वलन, बुद्धवंदना व त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले. यावेळी प्रमोद भालेराव, विलास रणपिसे, आनंद रणदिवे, नितीन थोरात व नामदेव सुरपल्लीकर यांनी मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील योगदान, सामाजिक समतेसाठीचे कार्य, कामगार व महिलांसाठी केलेल्या सुधारणा यांचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानिक मूल्यांचे रक्षण व सामाजिक समतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप धम्मपालन गाथेने झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम


























