सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) प्रतिनिधी अशोक कुंभार दि. 17 जुलै 2026 : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणारी परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ याविरोधात सासवड नगरपालिकेसमोर उभाठा गटाचे तालुकाप्रमुख व तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप यांनी शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षांचे पेपर वारंवार फुटत असल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फेरले जात आहे. गुणवत्तेपेक्षा गैरप्रकारांना खतपाणी घालणारी व्यवस्था विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र आज त्याच शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांनी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले असल्याची तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्यात यावी, पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनाकडे पुरंदर तालुक्यासह राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, सरकार यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























