आळंदी देवाची मानवमित्र.न्यूज संपादक रोहिदास कदम
पुणे जिल्ह्यातील विषारी दारूकांडात मृतांचा आकडा वाढत असताना आता संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणासाठी केवळ दारू माफियाच नव्हे, तर संबंधित प्रशासन आणि जबाबदार यंत्रणाही तितकीच दोषी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध हातभट्टी दारूचे अड्डे अनेक दिवसांपासून सुरू होते. संबंधित विभागांना याची माहिती असूनही वेळेत कठोर कारवाई करण्यात आली नाही. जर प्रशासनाने योग्य वेळी छापे टाकून अवैध व्यवसाय बंद केला असता, तर आज अनेक गरीब आणि कष्टकरी कुटुंबांचे आधारस्तंभ जिवंत असते.
हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचा जीव गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, मुलांच्या डोक्यावरचे छत्र हरपले. मात्र या सर्वासाठी जबाबदार कोण? अवैध धंदे सुरू असताना प्रशासन झोपले होते का? की काही अधिकाऱ्यांनी पैशांच्या मोहापोटी डोळेझाक केली? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
केवळ आरोपींना अटक करून हे प्रकरण संपणार नाही. या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या आशीर्वादाने हे अवैध जाळे सुरू होते, याचा शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल.
“वेळेत कारवाई झाली असती, तर आज निष्पापांचे जीव वाचले असते” अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असून, दोषींवर कठोर आणि उदाहरणात्मक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
— मानव मित्र न्यूज

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























