आळंदी.देवाची,(प्रतिनिधी रविदास कदम,)
) महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?
रोजगाराच्या नावाखाली भाषिक भेदभाव; मराठी अस्मितेवर घाला
महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, महाराष्ट्राच्या बाजारपेठेतून कोट्यवधींची कमाई करायची; पण नोकरी देताना मात्र मराठी युवकांना दूर ठेवायचे, हा प्रकार संतापजनक आणि निषेधार्ह आहे. एका खासगी कंपनीच्या नोकरी जाहिरातीत मराठी उमेदवारांबाबत आक्षेपार्ह उल्लेख झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर रोजगार नाकारणे हा केवळ मराठी माणसाचाच नव्हे तर भारतीय संविधानाचाही अपमान आहे. नोकरीसाठी पात्रता, गुणवत्ता आणि कौशल्य महत्त्वाचे असताना भाषिक भेदभावाचा विषारी खेळ खेळला जात असेल तर तो तात्काळ थांबवला गेला पाहिजे.
महाराष्ट्रातील तरुण आज बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक युवकांना डावलण्याचे प्रयत्न होत असतील तर त्याकडे सरकार, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राज्याच्या राजधानीतच मराठी युवकांना दुय्यम वागणूक दिली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला पाहिजे. 
मराठी माणूस कोणाच्याही विरोधात नाही; मात्र स्वतःच्या मातृभूमीत सन्मानाने जगण्याचा आणि रोजगार मिळवण्याचा त्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महाराष्ट्राची भाकर खायची आणि महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनाच नाकारायचे, ही दुटप्पी भूमिका आता सहन केली जाणार नाही. मानवमित्र न्यूज.ठळक मुद्दा
“महाराष्ट्रात उद्योग करा, व्यापार करा, प्रगती करा; पण मराठी युवकांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कधीही गप्प बसणार नाही!”

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























