पिंपरी, ता. २७ प्रतिनिधी रविदास कदम) . – ‘वृक्षदाई प्रतिष्ठान’देहू नगरपंचायत’ आणि ‘श्री संत तुकाराम देवस्थान’ यांच्या वतीने २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत वृक्षदाई व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. देहूतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होईल. यंदा व्याख्यानमालेचे दुसरे वर्ष आहे., अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी दिली.
सध्या जागतिक तापमानवाढ, सागरी प्रदूषण, नद्यांचे प्रदूषण व जैव विविधतेचा झपाट्याने होणारा ऱ्हास हे प्रश्न सबंध सृष्टीसमोर उभे ठाकले आहेत. या पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत प्रबोधन करणे हा वृक्षदाई व्याख्यानमालेचा उद्देश आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. २९) प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘चला वृक्षारोपण करू, निर्सगाशी नाते जोडू’ या विषयावर बोलणार आहेत. मंगळवारी (ता. ३०) प्रसिद्ध जलतज्ज्ञ सतीश खाडे हे ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर संवाद साधतील. शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. ३१) सागरमित्र विनोद बोधनकर हे ‘प्लॅस्टिक कचरा निर्मूलन सहभाग व चळवळ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
व्याख्यानमालेमध्ये यंदाचा ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली सेवा पुरस्कार’ ‘नाम फाउंडेशन’ला आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने असतील. तसेच ‘पद्मश्री डॉ. सु. वि. मापूसकर निर्मल सेवा पुरस्कार’सेवा सहयोग फाउंडेशन’ला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























