आळंदी देवाची प्रतिनिधी रोहिदास कदम
आळंदी : समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी येथे सुरू असलेल्या वादाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मशाळेच्या जागेवर ताबा मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून काही व्यक्तींमार्फत दादागिरी, धमकावणे आणि खोट्या तक्रारींचा वापर केला जात असल्याचा आरोप समाज बांधव आणि माजी-विद्यमान विश्वस्तांनी केला आहे.
समाज बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मशाळेच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत अनेक विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी खर्चाचा हिशोब मागितला असता त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. काहींवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, तर काहींना मारहाण झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात खोटे अर्ज देऊन समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला.
तसेच, धर्मशाळेच्या अधिकृत निवडणुकीत निवडून आलेल्या कार्यकर्त्यांचे बोर्ड हटवण्यात आल्याने वाद आणखी टोकाला गेल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामागे बाबा कांबळे यांचे नाव घेत गंभीर आरोप करण्यात आले असून, धर्मशाळेतील खर्च व निर्णय प्रक्रिया एकहाती चालवली जात असल्याचा आरोप समाजबांधवांनी केला आहे.
“धर्मशाळा ही संपूर्ण समाजाची मालमत्ता आहे, कोणाची खाजगी संपत्ती नाही,” अशी भावना व्यक्त करत समाजातील ज्येष्ठांनी सर्वांनी एकत्र येऊन या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. पुजारी म्हणून जबाबदारी पार पाडावी, मात्र समाजाच्या मालकीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नये, असेही काही समाजबांधवांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विश्वस्तांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनांवरूनही संताप व्यक्त करण्यात आला. काही प्रकरणांमध्ये तडजोडीसाठी पैशांची मागणी झाल्याचेही आरोप समोर आले आहेत. या सर्व घटनांमुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
समाजातील अनेक पदाधिकारी आणि बांधवांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























