(प्रतिनिधी योगेश भाऊ भोसले)
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यामुळे ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या मतदारसंघांमध्येच या निवडणुका होणार आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असून २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. अर्ज छाननीनंतर २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत.
या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध पक्षांनी तयारी सुरू के असून इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघांमध्ये भेटीगाठी, बैठका आणि रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार नसून, केवळ ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या ठिकाणीच निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या निवडणुकांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरील सत्तासमीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























